Saturday, February 13, 2010

मराठी मनाचा गोंधळ!

मराठी मनाचा गोंधळ!
काय झालय कोणास ठाउक, पण सर्वच मराठी राजकारण्यांचा गेला महिना फारच कठीण गेला. मुद्दा मुंबईचा असो किंवा महागाईचा ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा ! सर्वांच्याच विचारांची गल्लत चालली आहे आणि सामान्य मनाची फरपट!
विधानसभेतील जय पराजय आता सर्वांच्याच पचनी पडले आहेत. अनपेक्षीत विजयाच्या नंतरही, आठ दिवसांची वेळ टळूनही न बनलेल्या मंत्रीमंडळाची गोष्ट आता विस्मरणात चालली आहे. निवडणूकीच्या खर्चाची ताळमेळ करण्यासाठी वाढवलेल्या साखरेच्या भावाची गोडी आता दूर सारणे, कठीण होत आहे, कारण आता नियंत्रण शरदरावांचे नसून ते व्यापारी बंधवांच्या हातात आहे. महागाईचा भडका अन्नमंत्री, अर्थमंत्री आणि स्वत: प्रधानमंत्री ह्याना समजेनासा झाला आहे. ह्यातच काही एक आवश्यकता नसलेले विधान अशोकराव त्यांच्या पोरकट भावाने करून गेले, “मुंबईत टॆक्सीवाले मराठीच असतील”! आणि हे वाक्य ऐकताच विजनवासात गेलेले उध्दवराव अचानक गुरगुरू लागले देखिल! अशोकरावांना एव्हाना आपण चुकीचा विषय हाताळत असल्याची जाणिव दिल्लीकरांनी करून दिली गेली असावी. कारण त्यांनी बोललेल्या वाक्याचा अर्थ चूकीचा लावला गेला अशी सारवासारव करायलाही ते विसरले नाहीत.
ह्या वादातच अवधूत गुप्त्यांचा झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा…. ह्यावर मराठा मर्द गडी ज्यांचा शिक्षणाशी सूतराम संबंध नाही आणि नारायण राणे ह्याचे सुपुत्र सरसाऊन उठले. ह्यावेळी मात्र सरकारला विचारांचे स्वातंत्र्य आणि त्याला संरक्षण हे काही आठवले नाही. मात्र श्हारूख वादातून उठलेले वादळ शमविण्यासाठी अशोकरावांचे सरकार सरसावले आहे. ह्याच वादात नको असताना धर्मराजांची जागा घेणारे मोहनराव भागवत आणि माधव तसेच गडकरी देखील आपले मत देउन गेले. गेल्या आठवड्यातील राहूलची मुंबई भॆट गनीमीकावा सा्धून गेली आणि म्हणून मराठी मनाचा गोंधळ अधीकच विचित्र बनू लागला आहे. शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रीटीशांनी नेली, पण गमीनी काव्याचे साफ़्टवेअर दिल्ली हाती लागल्याची खंत अधिक बोचरी आहे.
मुंबईत मराठी जोर कमी झाल्याची खंत आपणा सर्वाना असायलाच हवी, पण त्याही पेक्षा अधीक आवश्यक आहे ती आत्मपरिक्षणाची! मुंबईचा विकास करताना पारशी, गुजराथी बांधवांचे योगदान दूर करून चालणार नाही. कारखानदारी ह्या दोघानीच पेलेली होती. ह्या दोघांची चाकरी करण्यात आम्हाला धन्यता वाटली, ह्या नोकरीच्या स्पर्धेत पहिल्यांदा दाक्षिणात्य शिरले, त्यांना काबूत आणण्याचे काम शिवसेनेने निश्चित केले, पण त्यातून मराठी माणूस निश्चित शहाणा झालेला नाही. मनोहर जोशींच्या कोहिनूर मधून हजारो मराठी हातांना रोजगार मिळाला, पण मनोहररावांबरोबर आणखी कोणी टाटा बनले नाही. आमची कोठेही शाखा नाही हिच धन्यता आपण उगाळित राहिलो.
मराठी माणूस शिक्षणात कमी पडला असे मूळिच नाही. पण संशोधन व कारखानदारी ह्यात तो मूळीच छाप उठवू शकला नाही. एकही नोबेल मराठी नावासमोर न लागण्याइतके आपण षंढ आहोत काय? व्यापार, शेअर्स, उद्योग, कंत्राटदारी ह्यात आपण न उतरून तोटा करून घेत आहोत. आपण श्रमाच्या कामातही कमी पडत आहोत. फयान वादळात कोकणातील शेकडो जहाजे बूडुनही ह्या कानाचे त्या कानाला कळले नाही, कारण त्यावर काम करित मेलेले हजारो प्राण बिहारी व यूपी भय्यांचे होते. तुमच्या गावातील भंगार गोळा करायचे काम भय्या करतो, केळी व फळे तोच विकतो, बेक-या त्यांच्याच! काजू बी व्यापारही आता भय्यांच्याच हाती गेला आहे. गवंडी आणि टाईल्स काम तेच करतात, इतकेच कशाला मराठी नावे लावणा-या सलून मधील केस कापणारा न्हावी हा भय्याच असतो. स्वीट मार्ट एकजात राजस्थानी व युपी बय्यांची आहेत. कापड मार्केट, हार्ड्वेअर ईकडे आपण कधी बघीतलेच नाही. बिगारी काम कन्नड, तेलगू आणि उरिया लोकांच्या हाती गेले आहे. मोटर मेक‘एनिक व टायरवाले केरळी आहेत. परवा लग्नाला बोलावलेले भडजी देखील युपीचे होते. रेल्वे स्टेशनवरील एकही दूकान मराठी माणसाचे नाही. विमान उद्योगाची गोष्ट फ़ारच दूरची. हावरे, डिएस्के, पेठे, गाडगीळ, चितळे, किर्लोस्कर, गरवारे, नाईकनवरे एवढी दोनचार नावे मराठी झेण्डा फडकवीताना दिसतात, ह्यामध्ये हजार पटीने वाढ होणे आवश्यक आहे, तरच मराठी मन आणि नाव जिवंत राहील हेच निश्चित………