Saturday, September 25, 2010

नमस्कार,
भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे!!
भारतीय राजकारणातही अशीच मरगळ आलेय, आळस साचलाय आणि म्हणूनच शरद पवार, सुरेश कलमाडी, नारायण राणे या सारख्या नेत्यानी देखिल ताळतंत्र सोडलय, असच वाटतय!
महागाई वर कोणतेही उत्तर न सापडलेले पवार साहेब आता कर्जमाफ़ी नाही असे ऒरडू लागले आहेत, गेली कर्ज माफ़ी काय शेतक-याच्या भल्यासाठी दिली होतीत, निवडणूकीतील कार्यकर्त्यांची कर्जे शासनदरबारातून माफ़ करण्याचा डाव साधलात, कर्जमाफ़ीमुळे शेतक-याच्या आत्महत्येमधे कोणताही फरक पडलेला नाही. शेतक-यांच्या आत्म्हत्येमागे त्यांची कमी होणारी उत्पादकता हे महत्वाचे कारण आहे, आणि जोपर्यंत त्या गोष्टी कडे लक्ष दिले जात नाही, तो पर्यंत हे सरकारी खून सूरूच राहतील. शेतक-याला कर्जमाफ़ीचे सलाईन नको आहे, वेगेवेगळ्या सबसीडींचे गाजरही नको आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, दलाल, अडते, साठेबाज,सरकारी खरेदी विक्री, निर्यातदार ह्यांचा वेठबिगारातून त्याला स्वच्छ कारभाराचा दिलासा दिलात तरी पुरे झाले. कृषी उत्पन्न बाजार समित्यामधे राजकिय पक्षाचे कार्यकर्ते फक्त वसूली करण्यासाठीच सहभाग घेतात, त्यांना वाटून दिलेली ती कुरणे आहेत. गेल्या वर्षी उसाचे गाळप झाल्यावर वाढलेले साखरेचे भाव, फक्त साखर कारखानदारांचा व संबंधीत राजकारण्यांनी परिस्थितीचा फायदा कसा उठविला जाउ शकतो, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. १५रू किलोची साखर शेतक-याला वाढिव पैसा न देता चाळिस रूपये किलोने कशी विकली जाउ शकते, ही राजकारणी चाल सर्वसामान्य जनतेला समजणे कठीण आहे.
सुरेश कलमाडींनी राष्ट्रकूल स्पर्धा आयोजनेतील केलेला भ्रष्टाचार आता कॉंग्रेस नेत्यानाही किळसवाणा वाटू लागला आहे, आज मणिशंकर अय्यर ह्यांच्या मुलाखतीमध्ये हा भ्रष्टाचार साधरण पन्नास हजार कोटींचा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. चार दिवसांनी बाबरी मशिद राम जन्मभूमी विवादातील पहिला न्यायालयातील निकाल अपेक्षित आहे. मात्र सरकारने अजूनही डोके ठिकाणावर असेल तर राष्ट्रकूल स्पर्धाच्या दरम्यान हा निकाल लाउ देउ नये. अर्थात सरकारला राष्ट्रकूल स्पर्धा आयोजनेतील केलेला भ्रष्टाचार सहज पचवायचा असेल तर राम जन्मभूमीचा निकाल जरूर लाऊन त्याला आंतरराष्ट्रिय मान्यता मिळवून द्यावी.
नारायण राण्यांनी आपल्या खूनी खासदार मूलाच्या पाठी उभे रहाताना केलेली कवायत केविलवाणी वाटली, राण्य़ांनी जन्मभर जे केले त्यांच्या घरात गांधीजींचा जन्म थोडाच होणार! कणकवली कुडाळ मधे दिवसा ढवळ्या केलेले व पचवलेले खून आता राजपूत्र करित आहे. ही लोकशाही आता भ्रष्टाचारामुळे कलंकीत झाली आहे. मी पुढे जाउन म्हणेन पूर्वी ह्या सर्व गोष्टींचा हक्क फक्त राजेशाहीला होता. एका राष्ट्रात एका राजघराण्यातील पाच पंचवीस नातेवाईक असा फायदा घेत असतीलही कदाचित! पण विक्रमादित्य, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, हरिच्शंद्र, अशोक, शिवाजी महाराज, पेशवे, अहिल्याबाई अशा अनेक राजेशाहीत संस्कतीचा विकास झालेलाच दिसतो. चांगल्या राजेशाहीत झालेली प्रगती वादातीत उच्च दर्जाची होती. आज ओमान देशातील प्रगती ही चांगल्या राजेशाहीचा उत्तम नमुना आहे. टिळक आगरकर वादात आगरकर काही अर्थाने दूरदृष्टीचे होते असेच म्हणावे लागेल. लोकशाही मिळवण्याच्य़ा आधी जनता शहाणी करायला हवी हेच खरे! निरक्षर अज्ञानी जनतेच्या असाहय्यतेचा फायदा उठवून केलेले राज्य म्हणजे जंगल राजचा उत्तम नमुना ठरावा!

Saturday, February 13, 2010

मराठी मनाचा गोंधळ!

मराठी मनाचा गोंधळ!
काय झालय कोणास ठाउक, पण सर्वच मराठी राजकारण्यांचा गेला महिना फारच कठीण गेला. मुद्दा मुंबईचा असो किंवा महागाईचा ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा ! सर्वांच्याच विचारांची गल्लत चालली आहे आणि सामान्य मनाची फरपट!
विधानसभेतील जय पराजय आता सर्वांच्याच पचनी पडले आहेत. अनपेक्षीत विजयाच्या नंतरही, आठ दिवसांची वेळ टळूनही न बनलेल्या मंत्रीमंडळाची गोष्ट आता विस्मरणात चालली आहे. निवडणूकीच्या खर्चाची ताळमेळ करण्यासाठी वाढवलेल्या साखरेच्या भावाची गोडी आता दूर सारणे, कठीण होत आहे, कारण आता नियंत्रण शरदरावांचे नसून ते व्यापारी बंधवांच्या हातात आहे. महागाईचा भडका अन्नमंत्री, अर्थमंत्री आणि स्वत: प्रधानमंत्री ह्याना समजेनासा झाला आहे. ह्यातच काही एक आवश्यकता नसलेले विधान अशोकराव त्यांच्या पोरकट भावाने करून गेले, “मुंबईत टॆक्सीवाले मराठीच असतील”! आणि हे वाक्य ऐकताच विजनवासात गेलेले उध्दवराव अचानक गुरगुरू लागले देखिल! अशोकरावांना एव्हाना आपण चुकीचा विषय हाताळत असल्याची जाणिव दिल्लीकरांनी करून दिली गेली असावी. कारण त्यांनी बोललेल्या वाक्याचा अर्थ चूकीचा लावला गेला अशी सारवासारव करायलाही ते विसरले नाहीत.
ह्या वादातच अवधूत गुप्त्यांचा झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा…. ह्यावर मराठा मर्द गडी ज्यांचा शिक्षणाशी सूतराम संबंध नाही आणि नारायण राणे ह्याचे सुपुत्र सरसाऊन उठले. ह्यावेळी मात्र सरकारला विचारांचे स्वातंत्र्य आणि त्याला संरक्षण हे काही आठवले नाही. मात्र श्हारूख वादातून उठलेले वादळ शमविण्यासाठी अशोकरावांचे सरकार सरसावले आहे. ह्याच वादात नको असताना धर्मराजांची जागा घेणारे मोहनराव भागवत आणि माधव तसेच गडकरी देखील आपले मत देउन गेले. गेल्या आठवड्यातील राहूलची मुंबई भॆट गनीमीकावा सा्धून गेली आणि म्हणून मराठी मनाचा गोंधळ अधीकच विचित्र बनू लागला आहे. शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रीटीशांनी नेली, पण गमीनी काव्याचे साफ़्टवेअर दिल्ली हाती लागल्याची खंत अधिक बोचरी आहे.
मुंबईत मराठी जोर कमी झाल्याची खंत आपणा सर्वाना असायलाच हवी, पण त्याही पेक्षा अधीक आवश्यक आहे ती आत्मपरिक्षणाची! मुंबईचा विकास करताना पारशी, गुजराथी बांधवांचे योगदान दूर करून चालणार नाही. कारखानदारी ह्या दोघानीच पेलेली होती. ह्या दोघांची चाकरी करण्यात आम्हाला धन्यता वाटली, ह्या नोकरीच्या स्पर्धेत पहिल्यांदा दाक्षिणात्य शिरले, त्यांना काबूत आणण्याचे काम शिवसेनेने निश्चित केले, पण त्यातून मराठी माणूस निश्चित शहाणा झालेला नाही. मनोहर जोशींच्या कोहिनूर मधून हजारो मराठी हातांना रोजगार मिळाला, पण मनोहररावांबरोबर आणखी कोणी टाटा बनले नाही. आमची कोठेही शाखा नाही हिच धन्यता आपण उगाळित राहिलो.
मराठी माणूस शिक्षणात कमी पडला असे मूळिच नाही. पण संशोधन व कारखानदारी ह्यात तो मूळीच छाप उठवू शकला नाही. एकही नोबेल मराठी नावासमोर न लागण्याइतके आपण षंढ आहोत काय? व्यापार, शेअर्स, उद्योग, कंत्राटदारी ह्यात आपण न उतरून तोटा करून घेत आहोत. आपण श्रमाच्या कामातही कमी पडत आहोत. फयान वादळात कोकणातील शेकडो जहाजे बूडुनही ह्या कानाचे त्या कानाला कळले नाही, कारण त्यावर काम करित मेलेले हजारो प्राण बिहारी व यूपी भय्यांचे होते. तुमच्या गावातील भंगार गोळा करायचे काम भय्या करतो, केळी व फळे तोच विकतो, बेक-या त्यांच्याच! काजू बी व्यापारही आता भय्यांच्याच हाती गेला आहे. गवंडी आणि टाईल्स काम तेच करतात, इतकेच कशाला मराठी नावे लावणा-या सलून मधील केस कापणारा न्हावी हा भय्याच असतो. स्वीट मार्ट एकजात राजस्थानी व युपी बय्यांची आहेत. कापड मार्केट, हार्ड्वेअर ईकडे आपण कधी बघीतलेच नाही. बिगारी काम कन्नड, तेलगू आणि उरिया लोकांच्या हाती गेले आहे. मोटर मेक‘एनिक व टायरवाले केरळी आहेत. परवा लग्नाला बोलावलेले भडजी देखील युपीचे होते. रेल्वे स्टेशनवरील एकही दूकान मराठी माणसाचे नाही. विमान उद्योगाची गोष्ट फ़ारच दूरची. हावरे, डिएस्के, पेठे, गाडगीळ, चितळे, किर्लोस्कर, गरवारे, नाईकनवरे एवढी दोनचार नावे मराठी झेण्डा फडकवीताना दिसतात, ह्यामध्ये हजार पटीने वाढ होणे आवश्यक आहे, तरच मराठी मन आणि नाव जिवंत राहील हेच निश्चित………