Saturday, December 22, 2007

आजचा दिवस

काल श्री नारायण राण्यांनी आपले शंख फ़ुंकले, दिल्लीत मार्गारेट बाईंशी भेट घेउन कदाचित त्यांच्या सांगण्यानुसार योग्य वेळेची खात्री करुन घेतली आणि गुजरात व महाराष्ट्रात एकदमच शपथ विधी करुन टाकण्याचे स्वप्न ही बघितले असेल कदाचित! पण ही वेळ चुकलेली आहे असेच मला वाटते आहे. गुजरातमेध्ये श्री नरेन्द्रभाई सिहासनावर बसण्याची शक्यताच जास्त आहे, भडक प्रचारात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप मात्र कोणी केल्याचे दिसले नाही, मेहता पटेल कदाचित विरुद्ध असतील ही! पण मोदींनी गेल्या दहा वर्षातील गुजरातच्या प्रगतीचा आलेख अचंबित करणाराच आहे. कच्छमधील भूकंपानंतर चे पूनर्वसन असो किंवा नर्मदा सरोवराचे पाणी दूरवर नेण्याचे काम असो, नरेन्द्रभाईंची कामाची हातोटी निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. अशा कामसू नेत्याने मात्र भडक बोलण्यावर निश्चित बांध घालणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री म्हणून एकदा राज्यावर आल्यावर पटेल, मेहता नव्हे सर्व धर्माच्या जनतेची प्रगती प्रत्येक कामातून दिसली पाहिजे हे निश्चीत.
महाराष्ट्रातील तारू मा विलासरावांनी कुशलतेने पुढे हाकला हे कौतुकास्पदच आहे. पण मोटेत पतंगरावांपासुन नारायणरावांपर्यंत एकजात सर्वांनी बाशिंगे बांधलेलीच आहेत. ज्याच्या बाराव्या स्थानात दिल्ली ग्रह उच्चीचा, तोच पुढचा मुख्यमंत्री होणार! माझ्या मते हा बदल कॉग्रेसला महागात पडावा. दूसरा कोणताही नेता कॉग्रेसची पारंपारिक दलित व मुस्लिम मते त्यांना मिळवून देऊ शकणार नाही. मायावती बाईंची दॄष्टी महाराष्ट्रात स्थिरावेल असे मुळीच वाटत नाही, पण पारंपारिक मतातील २% फ़रकही महागात पडू शकेल. मा प्रमोद महाजनांच्या निधनानंतर भाजपाला कोणतीच ताकद उरली नसल्याचे जाणवत आहे. नितीन गडकरी, गोपिनाथ मुंढे, एकनाथ खडसे ह्यानी शेतकरी आत्महत्या, विजेचा प्रश्न, एस ई झेड, कमाल जमिन धारणा ह्याबाबत आपल्या भूमिका सतत लोकात जाउन स्पष्ट करायला हव्यात. मा उद्धवजी हे काम फ़ार नियोजन बद्ध पद्धतीने करताना दिसत आहेत, पुढच्या निवडणूकीत त्यांना ह्या गोष्टीचा निश्चीत फ़ायदा होईल. माझ्या मते मा छगन भुजबळ व गणेश नाईक पुढच्या निवडणूकी पर्यंत शिवसेनेत परत यावेत. त्यांची होणारी घुसमट आता थाबवणे कठीण आहे.
झी मराठीवर सारेगामाची स्पर्धा आता कठीण वळणापर्यंत येउन ठेपली आहे, वॅशाली भॅसने माडे, सायली पानसे आणि अनिरुद्ध जोशी तिघेही तुल्यबळ आहेत. बिचारी सायली ओक बाहेर पडली, ह्या स्पर्धेत आज सई टेंबेकर हवी होती. वॅशाली भॅसने माडेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ज्या वातावरणातून ती ह्या स्पर्धेत अंतिम पायरी वर पोहोचली आहे त्यात झी मराठी चा वाटा मोलाचा आहे. अशा अनमोल रत्नांचा ठेवा ह्या मराठी मातीत दुरवर पसरला आहे. मात्र अंतीम फेरी अनिरुद्ध मारणार हे निश्चित, त्याला मधुवंती बोरगावकर ची साथ असणार आहे.

Friday, December 21, 2007

सप्रेम नमस्कार,
काही तरी दररोज वाचण्याची आवड भरपूर जणांसारखी मला सुद्धा आहे. दररोज काही तरी लिहिण्याचा प्रयत्न गेले कित्येक दिवस मनात आहे, पण आळसामुळे तसेच राहून जायचे. मात्र ब्लॉगच्या रुपाने आता जादुची पाटीच हातात मिळाल्याचा आनंद आहे, त्यामुळे मन मोकळे करण्याची संधी समोर कोणी नसेल तरी सोडणार नाही. तसे माझे विचार अगदी चार चौघांसारखे सरळ सोपे, धोपट मार्गाचे. त्याच विचारात एका नव्हे अनेक भारतियांचे मन दडलय, विचार प्रकट न करणा-या अनेकांचे विचार तसेच असावेत हे मला पदोपदी जाणवते म्हणूनच हा लेखन संपर्क!
आपल्या कोणत्याच कॄतिमूळे कॊणालाही त्रास होउ नये, हा स्वभाव जपण्याचा मी सदैव प्रयत्न करतो. पण ह्या गोष्टीचाही त्रास कोणाला होत असावा, हे बघण्याचे धाडस मी कधीच केले नाही. पण ह्या अती वेगाने धावणा-या जगात, कोणाला पर्वा असो अथवा नसो, आपले वागणे इतरांच्या त्रासाचे नसावे हे मात्र निश्चित. मी चहा पित नाही, ही अगदी साधी गोष्ट! ह्या नविन वर्षा पासून कॉफ़ी सुद्धा न पिण्याचा विचार आहे. पण असे करण्याने आपण कोणाकडे अगदी सहज गेलो तर अडचण तर होणार नाही ना! चहा कॉफ़ी ने सहज पाहुणचार साधता येतो, आता ह्याला काय द्यावे, हा प्रश्न आपण निर्माण तर करणार नाही ना? पण चहा कॉफ़ी न पिणारे असंख्य असतील, त्याचाशी संपर्क करून प्रतिक्रिया घ्यायला निश्चित आवडेल.